राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस:
हवामान विभागाकडून पुढील चार दिवस पावसाचा इशारा

प्रतिनिधी | सांगली
महाराष्ट्रात आज अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसही झाला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मिरजच्या बेडग आणि आरगसह येथील परिसरात पाऊस पडला आहे.
हवामान विभागाने सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जो अंदाज वर्तवला होता, तो आज तंतोतंत खरा ठरला असून जिल्ह्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला असून, पावसासोबतच झालेल्या मोठ्या गारपीटीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्येही गारपीट झाली. यामुळे तालुक्यातील गहू, ज्वारी आणि द्राक्षे या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यातील तीन जिल्ह्यांना गारपीटीने झोडपून काढले आहे. यात सांगली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असून, या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि विजांपासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




