नववर्षात “अवकाळी एन्ट्री; २७ जिल्हयावर येलो अलर्टचे संकट

प्रतिनिधी | बुलडाणा
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात हवामानात अचानक बदल होत अवकाळी पावसाने जोरदार एन्ट्री घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील सुमारे २७ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून वादळी वाऱ्यासह पाऊस व विजांच्या कडकडाटाचा इशारा दिल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे विदर्भातील सर्वच जिल्हयात अंगाची लाहालाही होणारा उकाडा होत असल्याचे आढळून आले. मात्र मागील काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पटटा तयार होत असल्याने आता वातावरणात चांगालाच चढ-उतार होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होत आहे. या आधारावर हवामान विभागाच्यावतीने २१ जिल्हयांना येलो अलर्ट तर ७ जिल्हयांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्हयांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तसेच भाजीपाला पिके काढणीच्या टप्प्यात असल्याने या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच हवामानातील बदलांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरत आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे, वीजतारा कोसळण्याची शक्यता असल्याने अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.ं




