अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले ; पाच दिवसांतील चौथी घटना
प्रतिनिधी | बुलडाणा
जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याच्या व अपहरणाच्या घटना वाढत असल्याने महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील एका नामांकित हायस्कूलमधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही तक्रार ५ फेब्रुवारी नोंदवण्यात आली.
धाडवरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या, निजाम काळापासून बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गावातील १७ वर्षे ६ महिने वयाची अल्पवयीन मुलगी ही ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास करडी (धाड) येथील विद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गेली होती. मात्र सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, रुइखेड मायंबा ता. जि. बुलडाणा येथील विष्णू सुनील उगले वय २२ याने लग्नाचे आमिष दाखवून संबंधित अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. आरोपीने मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने ५ फेब्रुवारी रोजी धाड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विष्णू उगले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शांताराम जाधव करीत आहेत.
वाढत्या घटनांनी पालकांमध्ये भीती
गेल्या काही दिवसांत बुलडाणा जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या व अपहरणाच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ पाच दिवसांत चार घटना समोर आल्याने पालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत पालक अधिक सतर्क झाले असून, पोलिस प्रशासनानेही या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




