सिद्धेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त दहा क्विंटल पुरी-भाजीचा भंडारा
तिन्ही गावांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी | उकळी
मेहकर तालुक्यातील उकळी परिसरातील उकळी, सुकळी व घोरदडा या तिन्ही गावांच्या सहकार्याने संगम असलेल्या संस्थान तलावाच्या काठावर वसलेल्या सिद्धेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी तिन्ही गावाच्या सहकार्याने दहा क्विंटल पुरी-भाजीचा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा होत आहे. परिसरातील हे मंदिर सुमारे पन्नास वर्षे जुने व प्राचीन मानले जाते. स्थानिक गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, उदाजी ब्रह्मचारी तपश्चर्या करत असताना त्यांना येथे स्वयंभू शिवपिंड सापडली, अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्या दिव्य घटनेनंतर या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे स्थान तिन्ही गावांसाठी श्रद्धा, विश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनले असून अनेक भाविक येथे नवस बोलण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात.
दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी पहाटेपासून अभिषेक, रुद्रपाठ, महाआरती, नामस्मरण व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले आहे. यावेळी भाविकांसाठी तब्बल दहा क्विंटल पुरी-वांग्याच्या भाजीचा महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. तिन्ही गावांतील ग्रामस्थ, मंदिर समिती व स्वयंसेवक यांच्या संयुक्त पुढाकारातून नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामूहिक सहभाग आणि सेवाभावामुळे परिसरात भक्तीमय, मंगल आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.




