जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक : ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मुंबई :
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी निकाल जाहीर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर केली होती. सुरुवातीला ही निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार होती; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आणि मतदानाची तारीख बदलण्यात आली. त्यानुसार, शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणेंनी मतदानाचा हक्क बजावला
राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदारांना विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करावे असे आवाहन केले. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी देखील मतदान केले. मागील २७ वर्षांपासून नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात निष्कलंक कारभार राहिला. त्यामुळे महायुतीचा निश्चित विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी आधीच शस्त्र टाकले असून उपद्रवी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. कोल्हापुरात दोन गटात बाचाबाची
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात राशिवडे येथील ग्रामपंचायत केंद्रावर वयस्कर मतदारांना मतदानासाठी नेण्यावरुन दोन गटात किरकोळ बाचाबाची झाली. या वेळी दोन्ही गटांच्या जमावाने परिस्थिती तणावपूर्ण केली, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांचे नियंत्रणात आणले. खेडमध्ये राष्ट्रवादी नेत्यावर हल्ला




