चिखलीत महाले परिवारावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | चिखली
तालुक्यातील अमडापूर पोलिसा ठाणे अंतर्गत जुना वाद उफाळून आल्याची घटना नुकतेच घडली. या प्रकरणी तिघांनी एकाला स्टीलच्या पाईपाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसात तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना नुकतचे घडली.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील उदयनगर येथील रहिवासी आकाश रामदास झळे वय २३, हा आपल्या मित्रासोबत १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास परिसरातील एका बारजवळ गेला होता. परत येत असतांना गावातील ज्ञानेश्वर महाले, राजू महाले व सोपान महाले यांनी त्यांना गाठले. यावेळी राजू महाले याने याचे हातपाय तोडा असे इतर दोघांना सांगितले. यावर आरोपीनी आकाश झळे यांच्यावर स्टील पाईपने हल्ला चढवत बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या हात, पाय, खांदा, पाठ व डोक्यावर वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून ते बेशुद्ध पडले. जखमी अवस्थेत त्यांना नातेवाईकांनी खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून अमडापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आकाश झळे यांच्या तक्रारीवरुन महाले परिवारातील आरोपी ज्ञानेश्वर महाले, राजू महाले व सोपान महाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जुना वाद उफाळला
उदयनगर परिसरात झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामागे जुन्या भांडणाचे कारण असल्याची बाब समोर आली आहे. फिर्यादी आकाश झळे व आरोपी यांच्यात यापूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. त्या प्रकरणात परस्परांमध्ये समेटही झाला होता. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी आरोपींनी पुन्हा जुना वाद उकरून काढत आकाश झळे यांना गाठले. “गावात राहू देणार नाही” अशी धमकी देत संतापाच्या भरात स्टील पाईपने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावातील जुन्या वादातून पुन्हा हिंसाचार उफाळल्याचे स्पष्ट झाले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



