टीम इंडियाने कोलंबोत फडकवला तिरंगा

कोलंबो,
गेल्या काही आठवड्यांपासून शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या पाकिस्तानची सर्व ‘हेकडी’ भारतीय संघाने मैदानात उतरून काढली आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील या महामुकाबल्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७५ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर अचूक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानला अवघ्या ११४ धावांत गुंडाळून सुपर-८ मधील आपले स्थान निश्चित केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्याने भारत अडचणीत येईल असे वाटत होते. मात्र, इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. इशानने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने तिलक वर्मासोबत (२५ धावा) ८७ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. मधल्या फळीत कर्णधार सूर्यकुमार यादवने ३२ धावांचे योगदान दिले, तर शेवटच्या षटकांत शिवम दुबे (२७) आणि रिंकू सिंगच्या (११ धावा, ४ चेंडू) फटकेबाजीमुळे भारताने १७५ धावांपर्यंत मजल मारली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची ही भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
प्रत्युत्तरात १७६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबझादा फरहानला बाद करून मेडन ओव्हर टाकली. त्यानंतर दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने सैम अयुब आणि कर्णधार सलमान आघाला बाद करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले.




