पुण्यात मातंग साहित्य परिषदेतर्फे परिसंवादाचे आयोजन ; परिसंवाद २३ फेब्रुवारी रोजी
महापुरुषांच्या विचारांतून समता व समरसतामय राष्ट्राकडे विषयावर होणार चर्चा

पुणे,
क्रांतिज्योती मुक्ताई साळवे बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचालित मातंग साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त “महापुरुषांच्या विचारांतून समता आणि समरसतामय राष्ट्राकडे” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद रविवार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड, राजाराम पुलाजवळ येथे होणार आहे.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष, भटके विमुक्त आयोग, भारत सरकार पद्मश्री दादा इदाते हे राहणार असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे हे बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी समरसता गतिविधी, पश्चिम महाराष्ट्रचे सहसंयोजक मुकुंदराव आफळे तसेच पुणे महानगर विभाग संयोजक शरद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादात प्रा. अभय जोग, विलास लांडगे, अँड. आनंद गवळी व प्रा. विनोद सूर्यवंशी हे मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन मातंग साहित्य परिषद, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय उर्फ धनाजी सोमनाथ भिसे यांनी केले असून, समाजातील सर्व घटकांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे औचित्य
या परिसंवादाचे आयोजन संत रोहिदास महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे पुण्यतिथी तसेच राजे उमाजी नाईक पुण्यतिथीच्या निमित्ताने करण्यात आले असून, महापुरुषांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.




