जिल्ह्यात मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून केंद्रे त्वरित सुरू करा
ॲड. जयश्री शेळके यांची पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी | बुलडाणा
जिल्ह्यात यंदा मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असतानाही नाफेडकडून करण्यात येणारी खरेदी अत्यंत तुटपुंजी असून उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत अनेक खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले असून मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवून सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, बुलडाणा जिल्ह्यात २०२५–२६ च्या खरीप हंगामात ५२ हजार ८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात सुमारे २० लाख ६१ हजार ३७२ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी केवळ ६० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी नोंदणी केली असतानाही ‘उद्दिष्ट पूर्ण झाले’ या कारणावरून अनेक खरेदी केंद्रांवरील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात मका शिल्लक राहिला आहे. खरेदी बंद असल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दराने मका खरेदी केला जात असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासन हमीभावाची घोषणा करते; मात्र प्रत्यक्षात खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याची टीका ॲड. शेळके यांनी केली आहे. त्यामुळे जिल ्यातील अपेक्षित उत्पादनाच्या प्रमाणात नाफेडचे खरेदी उद्दिष्ट वाढवून बंद असलेली सर्व खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. तसेच नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जाईल, याची खात्री करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



