काश्मीरनंतर उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी

नवी दिल्ली
काश्मीरमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाल्यानंतर, आता उत्तराखंडमधील पिथोरागढ जिल्ह्यातील पंचचुली, हरदेवाल, नंदा देवी आणि नंदा कोट या उंच शिखरांवर, तसेच चमोलीतील बद्रीनाथ आणि हेमकुंडच्या उंच शिखरांवरही हलकी बर्फवृष्टी झाली आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे उंचावरील भागांत थंडीचा जोर वाढला आहे.
गंगा, कोसी, गंडक, बुढी गंडक, पुनपुन आणि बागमती नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील सुमारे २२.४२ लाख लोक या परिस्थितीमुळे बाधित झाले आहेत. भागलपूरमध्ये, ‘रिंग एम्बँकमेंट’ (संरक्षक बांध) ओव्हरफ्लो झाल्यामुळे सुलतानगंजमधील सुमारे ४,००० घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान, उत्तर प्रदेशात मान्सून पावसाचा जोर कायम आहे. बरेलीमध्ये रविवार दुपारपासून सुरू असलेल्या अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे अग्निशमन केंद्राच्या परिसरातील पाण्याची पातळी तीन फुटांपर्यंत वाढली. तसेच, लोकांच्या घरांच्या स्वयंपाकघरात आणि शयनकक्षात गुडघ्यापर्यंत पाणी साचले.



