आता मराठवाडा, विदर्भात गारपीटीची शक्यता; राज्यात पुन्हा पावसाचा अलर्ट

प्रतिनिधी | मुंबई
राज्यातील मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्हयात 30 मार्चपासून पावासचा अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक जिल्हयात 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.




