धामणगावबढे मध्ये मुरूम-गिट्टी न टाकल्यास २९ जुलैपासून आमरण उपोषण

धामणगाव बढे
धामणगाव बढे येथील भैरवनाथ मंदिर ते बजरंगबली मंदिर दरम्यानच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचत असून, येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडत आहे. शाळकरी विद्यार्थी, मंदिरात जाणारे भाविक तसेच नमाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तातडीने मुरूम व गिट्टी टाकून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन एस. घोंगडे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन सादर केले. आठवडी बाजार परिसरासह गावातील खराब झालेल्या रस्त्यांवर तातडीने मुरूम आणि गिट्टी टाकून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोन-तीन दिवसांत काम न झाल्यास मोर्चा
निवेदनात नमूद केल्यानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास २८ जुलै २०२६ नंतर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच २९ जुलै २०२६ पासून गजानन घोंगडे आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, बुलढाणा), गट विकास अधिकारी (मोताळा) तसेच धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.




