सीटूचा स्टेट बँक चौकात रास्ता रोको; जिल्हाभरातील हजारो कामगारांचा सहभाग

बुलडाणा
केंद्र व राज्य सरकारच्या कंत्राटीकरण व खासगीकरणाच्या धोरणांसह कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीआयटीयू) वतीने सोमवार १० ऑगस्ट रोजी स्टेट बॅक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या हजारो कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
जिजामाता प्रेक्षागृहापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. दरम्यान, स्टेट बँक चौकात आंदोलकांनी रास्ता रोको करून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला. सीआयटीयूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार नारेबाजी करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, केंद्र सरकारने जुन्या २९ कामगार कायद्यांऐवजी चार श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा कामगारांच्या रोजगाराच्या स्थैर्यावर परिणाम होत आहे, कंत्राटीकरण व खासगीकरणाला प्रोत्साहन मिळाल्यास कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी कमी होतील आणि कामगारांचे शोषण वाढेल, चारही श्रमसंहिता तातडीने रद्द करण्यात यावे, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगार व अर्धवेळ स्त्री परिचर यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवेत कायम करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. हा निर्णय होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना किमान ३० हजार रुपये मानधन, पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी आंदोलनात प्रतिभा पाटील, मंदा डोंगरदिवे, सरला मिश्रा, ललिता बोदडे, प्रज्ञा तायडे, विजया ठाकरे, रेखा इंगळे, शारदा खोडके, वर्षा बेदरकर, आरती सोनटक्के, सीमा, ज्ञानेश्वर वाघमारे, शोभा काळे, उषा डुकरे, उर्मिला राठोड, गोदावरी खंडेराव, अन्नपूर्णा कुकडे, जयश्री तायडे, रश्मी दुबे, छाया खंडारे, कुशीवर्ता शिंदे, शारदा खंडेराव, अनुपमा जाधव, मुक्ता काकर, सीमा शेळके, शारदा लिंगायत, वैशाली राणे, मंदा मिसाळ, उर्मिला माठे, ज्योती खर्चे, निशा घोडे, संगीता मादनकर, वनमाला वानखेडे, सखुबाई श्रीनाथ, संगीता कस्तुरे, सावित्री कोकाटे, माया वाघ, मंजुषा झीने, गंगा अंभोरे, विजया शेळके, अनिता खडसे यांच्यासह असंख्य कामगार सहभागी झाले होते.
शेतकरी, शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नांकडेही वेधले लक्ष
मोर्चा दरम्यान सीटू कडून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान हमीभाव देण्यात यावा, संपूर्ण कर्जमाफी तसेच पीकविमा, खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेती अवजारांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात यावे, वाढती महागाई नियंत्रणात आणावी, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी रोखावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




