राजूर घाटात विद्यार्थ्यांनी अनुभवला निसर्गाचा सहवास; ट्रेकिंगसोबत पर्यावरण संवर्धनाचा धडा
एडेड उच्च माध्यमिक विद्यालयाची वर्षा सहल उत्साहात; २५० विद्यार्थ्यांचा सहभाग

बुलढाणा,
पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याच्या उद्देशाने एडेड उच्च माध्यमिक विद्यालय, बुलढाणा येथील विद्यार्थ्यांची वर्षा सहल व ट्रेकिंग उपक्रम राजूर घाटात उत्साहात पार पडला. अजिंठा पर्वतरांगांचा भाग असलेल्या राजूर घाटातील निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांना वनस्पती, प्राणी आणि जैवविविधतेची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.
शनिवार, ८ ऑगस्ट रोजी आयोजित या सहलीदरम्यान विषयतज्ज्ञांनी परिसरातील विविध वनस्पती व प्राण्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ट्रेकिंग करताना कोणती काळजी घ्यावी, निसर्गात वावरताना कोणत्या बाबींचे भान ठेवावे, याबाबत प्रा. एन. टी. उबरहंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राजूर घाटातील प्रसिद्ध बालाजी मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी भोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर खेळ, नृत्य तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. प्रा. हेलगे व प्रा. तळणीकर यांनी विद्यार्थ्यांना केळीचे वाटप केले.
मोबाईलपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात
दैनंदिन जीवनातील मोबाईलच्या वापरापासून काही काळ दूर राहून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्गाचा आनंद घेण्याची संधी या सहलीमुळे मिळाली. विविध वनस्पती, प्राणी आणि डोंगररांगांचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन गोष्टी शिकल्याचा आनंद दिसून येत होता. जवळपास २५० विद्यार्थ्यांनी या वर्षा सहलीत सहभाग घेतला.
प्राचार्य धनंजय किंबहुने, क. म. वि.चे प्रमुख प्रा. अजय ताम्हण व प्रा. हेलगे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक मंडळ तसेच शाळा निरीक्षक आर. ओ. पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले.
सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एम. एस. तळणीकर, प्रा. एन. टी. निवृत्ती उबरहंडे, प्रा. डॉ. डी. वाय. दिवाने, प्रा. बी. एस. शिंदे, प्रा. एम. व्ही. पाटील, प्रा. जी. एच. तुपे, प्रा. ए. पी. पत्की, पूजा भांडेकर, प्रा. डी. टी. उबरहंडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



