आ. गायकवाड यांनी केली बांधावर जावून पाहणी
मोताळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

मोताळा
पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने मोताळा तालुक्यातील खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, मका, तूर, कापूस यासह अन्य पिकांची अवस्था चिंताजनक झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांनी १० सप्टेंबर रोजी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मोताळा तालुक्यात सुमारे ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार गायकवाड यांच्याकडे आपल्या अडचणी व व्यथा मांडल्या.
आमदार गायकवाड यांनी बोराखेडी, डिडोळा, महालपिंपरी, तळणी, चावरदा, पान्हेरा, रोहिणखेड, गुळभेली आणि खडकी या गावांतील शेतशिवारांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि संभाव्य नुकसानीची माहिती त्यांनी घेतली.
नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याला संकटाच्या काळात आधार देणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांसमोर मांडून नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोताळा तालुक्यातील परिस्थिती गंभीर असून संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचेही आमदार गायकवाड यांनी सांगितले. प्रशासनाने पिकांच्या नुकसानीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार सरिता पाटील, तालुका कृषी अधिकारी शिरसाट, नायब तहसीलदार डाबेराव, देशमुख यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, शिवसेना-युवासेना तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




