पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून ८४.२३ कोटींचा निधी मंजूर
अमरावती विभागातील २८ हजार ७५१ शेतकऱ्यांना ६८ कोटींची मदत

मुंबई
एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महसूल व वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणास मंजुरी दिली असून, अमरावती विभागात याचा २८ हजार ७५१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून लाभापोटी ६८०९ लाख रुपये उपलब्ध करुन िदले जाणार आहे.
या निर्णयाचा लाभ राज्यातील अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या सहा महसूल विभागांतील ४५ हजार ४२ शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच ३८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान या मदतीत समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अमरावती विभागातील पाच ही जिल्हयात सुमारे ३०,३२५.१० क्षेत्र बाधीत झाले होते, याचा फाटका विभागातील २८,७५१ शेतकऱ्यांना बसला होता. त्यानंतर महसूल यंत्रणेने पंचनामे करून विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. प्राप्त प्रस्तावांची छाननी केल्यानंतर राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत मदत मंजूर केली आहे. शासनाच्या नियमानुसार अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ तसेच इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात एका हंगामात एकदाच आर्थिक मदत दिली जाते. त्याच निकषांनुसार या निधीचे वितरण करण्यात येणार आहे.
थेट बँक खात्यात जमा होणार मदत
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झालेली मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाच्या वसुलीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वळती करू नये, अशा स्पष्ट सूचना शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे मंजूर झालेली संपूर्ण मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, निधीच्या वितरणात पारदर्शकता राखली जाणार आहे.




