लोणारात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह
श्रीराम मंदिर देणगीतील अपहार प्रकरणी कांग्रेस आक्रमक

लोणार
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगी व्यवहारात कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार तसेच बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले.
शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात झालेल्या या सत्याग्रहाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके व शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष भूषण पाटील, उपनगराध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, बांधकाम सभापती अनिकेत मापारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गात गांधीवादी पद्धतीने सत्याग्रह केला. प्रभू श्रीराम हे न्याय, सत्य, मर्यादा आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक असल्याचे सांगत, श्रीरामांच्या नावाने देशभरातील भाविकांनी दिलेल्या देणगीचा संपूर्ण व पारदर्शक हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी करण्यात आली
याप्रसंगी उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची परंपरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमानाची प्रेरणा यांचा उल्लेख करत सत्य व पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सत्याग्रहात नगरसेवक पंढरी चाटे, नगरसेवक श्याम राऊत, नगरसेवक गुलाब सरदार, सभापती साहेबराव पवार, नगरसेवक जमील कुरेशी, माजी नगरसेवक शेख रऊफ, माजी नगरसेवक अंबादास इंगळे, गोपी आखाडे, शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, एजाज खान,विकास मोरे, भवानी मापारी, तानाजी मापारी, आप्पा शिंदे, काँग्रेस पक्षाचे तसेच मोठ्या संख्येने रामभक्त, नागरिक, स्थानिक पदाधिकारी, आणि कार्यकर्ते सहभागी झाले.




