रस्ता सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार; गजानन घोंगडे यांचा निर्धार

एस. बी. शेख | धामणगाव बढे
येथील हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून उद्घाटनही झाले असतानाही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे यांनी मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता स्मशानभूमी रस्त्यावर आमरण उपोषण सुरू केले.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि पाणी साचत असल्याने नागरिकांना तसेच अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी यापूर्वी प्रशासनाला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत उलटूनही कामाला सुरुवात न झाल्याने अखेर घोंगडे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. “प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू झाल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम इशारा गजानन घोंगडे यांनी दिला आहे.
दरम्यान, आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रखडलेले काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि रस्त्याचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




