यावर्षी मान्सूनला विलंब होण्याची शक्यता

प्रतिनिधी | दिल्ली
यावर्षी देशात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने सोमवारी दिली. भारतीय हवामान विभाग नुसार, 2026 च्या मान्सून हंगामात देशात सुमारे 80 सेंटीमीटर पाऊस पडू शकतो. 1971-2020 च्या आकडेवारीनुसार, देशात सरासरी पाऊस 87 सेंटीमीटर मानला जातो. हवामान विभागाच्या अनुशंगाने गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाख, छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या मध्य भागांत, दक्षिण ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त देशाच्या बहुतेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाचे उपमहासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले की, यावर्षी देशात एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) सुमारे 92% राहण्याचा अंदाज आहे. हे 2018 नंतरचे सर्वात कमी प्रमाण आहे. 2018 मध्ये सरासरीच्या तुलनेत 91% पाऊस झाला होता.
गेल्या वर्षी मान्सून 8 दिवस आधी आला होता
गेल्या वर्षी मान्सून निर्धारित वेळेच्या 8 दिवस आधी, म्हणजेच 24 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. केरळमधून पुढे सरकत मान्सून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत पोहोचतो. 11 जूनपर्यंत मुंबईत आणि 8 जुलैपर्यंत तो संपूर्ण देशात पसरतो.
याची माघार उत्तर-पश्चिम भारतातून 17 सप्टेंबर रोजी सुरू होते आणि 15 ऑक्टोबरपर्यंत तो पूर्णपणे परत जातो. अल नीनो प्रभावामुळे मान्सूनला उशीर होऊ शकतो. तथापि, हंगामाच्या शेवटी थोडा दिलासा मिळू शकतो.
आयएमडीच्या आकडेवारीनुसार, गेल्या 150 वर्षांत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याच्या तारखा वेगवेगळ्या राहिल्या आहेत. 1918 मध्ये मान्सून सर्वात आधी 11 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता, तर 1972 मध्ये सर्वात उशिरा 18 जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता.




