हिंगोली, मुंबई, सोलापूर, येवल्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
उकाड्यापासून दिलासा; काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या

येवला
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असताना शुक्रवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील मुंबई, सोलापूर, हिंगोली व येवला शहर व परिसराला जोरदार झोडपले. दिवसभर कडक उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
जोरदार वाऱ्यामुळे शहरातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली. दुचाकीस्वार व पादचारी यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व वातावरण सक्रिय झाले असून हवामान विभागाने पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमनही नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. हवामान खात्याने नागरिकांना वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.




