पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी
मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्रकार संघटनांचे निवेदन

लोणार
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड-राहेरी येथील वाळू घाटावर वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेनंतर पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकाराविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी २२ मे रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
लोणार तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार रामदास कहाळे हे वाळू घाटावरील हालचालींचे चित्रीकरण करत असताना काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी पीडित पत्रकारावरच किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रकारांवर दबाव टाकण्याचे प्रकार थांबवून निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनावर डॉ. अनिल मापारी, रेहमान भाई, सचिन गोलेच्छा, गोपाल तोष्णीवाल, उमेश कुटे, राहुल सरदार, श्याम सोनुने, पवन शर्मा, शेख समद, विठ्ठल घायाळ, किशोर मोरे, शेख यासिन, सुनील वर्मा, अनिल वायाळ, अशोक इंगळे, संदीप मापारी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.




