बुलडाण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन, सत्कार भव्य रॅलीचे आयोजन आज

बुलडाणा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्या वतीने शनिवार, १ ऑगस्ट रोजी शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व अभिवादनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विजय अंभोरे राहणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा पूजा गायकवाड, नगरपरिषद गटनेते मृत्युंजय गायकवाड, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरसेविका वैशाली सुरडकर, सपना मावतवाल, राखी बेंडवाल तसेच नगरसेवक विनोद बेंडवाल, प्रशांत (बाळू) जाधव, श्रीकृष्ण शिंदे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामेश्वर जाधव, माजी अध्यक्ष मंगल भालेराव, विकी आव्हाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुतळा पूजन व अभिवादनाने होईल. त्यानंतर जगदंबा नगर, अण्णाभाऊ साठे नगर आणि वीर लहुजी नगर येथे अभिवादन, पूजन तसेच मान्यवरांचा सत्काराचे कार्यक्रम पार पडतील. सायंकाळी ५ वाजता जस्तंभ चौक येथील अण्णाभाऊ साठे स्मारकापासून भव्य रॅली काढण्यात येणार असून आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड आणि विजय अंभोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ होणार आहे.
या जयंती उत्सवानिमित्त मातंग समाजातील सर्व सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी कर्मचारी तसेच नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रामेश्वर जाधव यांनी केले आहे.
दिवसभर असे राहणार कार्यक्रम
सकाळी १० वाजता अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुतळा पूजन व अभिवादनाने कार्यक्रमाला प्रारंभ होईल. सकाळी १०.३० वाजता जगदंबा नगर येथे अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता अण्णाभाऊ साठे नगर येथे पूजन, अभिवादन आणि मान्यवरांचा सत्कार होईल. सकाळी ११.३० वाजता वीर लहुजी नगर येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता जस्तंभ चौकातील अण्णाभाऊ साठे स्मारकापासून भव्य रॅली काढून जयंती उत्सवाची सांगता होणार आहे.
लोकसहभागाचे आवाहन
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या जयंती उत्सवात मातंग समाजातील सर्व सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी कर्मचारी तसेच नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे. या माध्यमातून समाजाची एकजूट आणि संघटनशक्ती अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.




