वेद , उपनिषद, धर्म ग्रंथावर अनेक देशात सुरु आहे संशोधन

जयंत राजुरकर यांचे प्रतिपादन
जानेफळमध्ये विशाल हिंदू संमेलन संपन्न…
प्रतिनिधी | जानेफळ
ज्या काळात पाश्चिमात्य संस्कृती प्राथमिक अवस्थेत होती त्या काळात भारतात वेद शिकवल्या जात होते. अनेक देश चारशे ते पाचशे वर्षापूर्वी निर्माण झाले. परंतु भारत देश, हिंदू धर्म, संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. प्राचीन काळात ऋषी, मुनींनी अनेक धर्म ग्रंथ, वेद,उपनिषद निर्माण केलेत.यावर अनेक देशात संशोधन सुरु आहे. कारण हिंदू धर्म जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. असे प्रतिपादन मलकापूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा खामगाव अर्बन बँकेचे संचालक जयंत राजुरकर यांनी केले.
ते रा.स्व.संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित विशाल हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. श्री १००८ हभप अमोलानंद महाराज आणि अशोक घाटे प्रमुख अतिथी होते. ते पुढे म्हणाले की, मोठ्या शहरातील कुटुंब पद्धती पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार करत आहे.यामुळे लोकसंख्येचे असंतुलन होत आहे.हिंदूंचा जन्मदर १९४७ साली ९२ टक्के होता. २०११ च्या जनगणनेनुसार तो ७८ टक्के झाला आहे. यामधील संभाव्य धोका ओळखा असा इशाराच त्यांनी दिला आहे.
कार्यक्रमाच्या अगोदर शेकडो युवकांनी गावातील मुख्य मार्गावरून मोटारसायकल रॅली काढून वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला मान्यवरांकडून भारत माता पुजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर गजानन पाखरे , दिनेश वर्मा आणि गजानन दाळीमकर यांनी ‘हम करे राष्ट्र अराधन ʼ हे स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु केदारे यांनी तर आभारप्रदर्शन शाम वाळके यांनी केले. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
— स्नेहसंमेलनात असते पाश्चिमात्य संस्कृतीची वेशभुषा —-
हिंदू धर्मातील संस्कृती, परंपरा आपण विसरत चाललो आहोत. समाज माध्यमांवर धर्माची टिंगल टवाळी केली जात आहे.शाळेच्या स्नेह संमेलनामधुन लहान मुलांना पाश्चिमात्य संस्कृतीची वेशभूषा आणि अभिनय आपणच करायला सांगतो. नंतर त्याचे कौतुक करतांना टाळ्या वाजवतो. ह्या टाळ्या धर्माच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणार आहेत. आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करेल असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अमोलानंद महाराज यांनी मांडले.
—-




