बुलडाण्याच्या भाविकांच्या बसचा वाराणसी येथे अपघात; दोन ठार, २० गंभीर
भाविक नेपाळ वरुन वाराणसी येथे जात होते

प्रतिनिधी | बुलडाणा,
महाराष्ट्रातून पन्नास पर्यटक वाराणसीला गेले होते. येथे दर्शन आणि पूजा-अर्चा करून ते सर्व नेपाळला गेले. वाराणसीला परतल्यानंतर प्रवाशांनी उत्तर प्रदेशहून महाराष्ट्राला जाण्यासाठी बस बुक केली. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, गाझीपूरच्या नंदगंजमधील नवसारा गावात पोहोचताच बस अचानक डिव्हायडरला धडक देत पलटली. या अपघातात दोन जण ठार झाले तर २० गंभीर जखमी आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बस पुन्हा सरळ होण्यापूर्वी तीन वेळा उलटली. बस वेगात असल्याने धडकेमुळे प्रवासी एकमेकांवर पडले. जखमी प्रवासी मदतीसाठी ओरडत होते. सदर बस अपघात पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवले. यातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी महर्षी विश्वामित्र स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मृत झालेल्या दोन महिलांचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
मृत झालेल्या महिलांपैकी एकाची ओळख महाराष्ट्रातील बुलढाणा येथील सरस्वती (७०) आणि दुसरीची अकोला येथील अन्नपूर्णा (५०) अशी पटली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीनुसार, तीन जखमींची प्रकृती गंभीर आहे.
एएसपी काय म्हणाले?
अपघातानंतर एएसपी राकेश मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बसमधील सर्व यात्रेकरू महाराष्ट्रातील रहिवासी होते. त्यांनी वाराणसीहून बस भाड्याने घेतली होती आणि ते नेपाळला गेले होते. नेपाळहून परत येत असताना हा अपघात झाला. बस अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली. बस अनियंत्रित होण्याचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत डॉक्टर, पोलीस आणि जिल्हा प्रशासन सतर्क आहेत. जर जखमींपैकी कोणाची प्रकृती गंभीर असेल आणि त्यांना वरिष्ठ रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासल्यास, तसे केले जाईल. सध्या, २० जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोणाचीही प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त नाही. बसमध्ये एकूण ५० जण होते अशी माहिती मिळाली.
00



