अन्न हे पूर्णब्रह्म या उक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींची भूक भागविणे हीच खरी सेवा – माजी प्राचार्य भिकमचंद रेदासनी
दर महिन्याच्या अमावस्येला अन्नदानाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे

प्रतिनिधी | लोणार
“अन्न हे पूर्णब्रह्म” या उक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींची भूक भागविणे हीच खरी सेवा आहे. अन्नदान हे भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ दान मानले जाते आणि अशा उपक्रमांमुळे समाजात दानशूरतेची भावना वाढीस लागून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते असे मत माजी प्राचार्य भिकमचंद रेदासनी यांनी व्यक्त केले.
ते, स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आयोजित अन्नदान कार्यक्रमा दरम्यान बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन तांबर स्थानकवासी श्रावक संघ व जीनेश्वर ग्रुप यांच्या वतीने १७ एप्रिल रोजी करण्यात आले होते. समाजसेवा आणि परोपकाराची परंपरा जपत येथील श्वेतांबर स्थानकवासी श्रावक संघ व जीनेश्वर ग्रुप यांच्या वतीने दर महिन्याच्या अमावस्येला अन्नदानाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. महाराष्ट्र ज्ञान गंगोत्री स्व. प. पू. श्री प्रभाकवरजी म.सा. यांच्या आशीर्वादाने तसेच उपप्रवर्तक कोटा संघ प्रमुख प. पू. श्री श्रुतमुनीजी म.सा. आणि जिनशासन प्रभाविका प. पू. श्री चैतन्य श्रीजी म.सा. यांच्या प्रेरणेने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे हा आहे. त्यानुसार शुक्रवार, १७ एप्रिल रोजी श्रीमती बनारसबाई शांतीलालजी राका परिवार यांच्या वतीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात अन्नदान करण्यात आले. यावेळी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व पौष्टिक अन्नाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळाला असून, रुग्णालय परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी माजी प्राचार्य भिकमचंद रेदासनी, संजय राका, प्रमोद राका, यश राका, अनिल संचेती, दीपक कोचर, आशिष रूनवाल, ऋषभ कोठारी, ऋषभ गेलडा, सुमित रूनवाल, मित गेलडा, अभिषेक भन्साळी, संयम रेदासनी, संजय बरडिया, पारस कोठारी, रुपेश बरडिया, किशोर सोनिग्रा, योगेश आर्य, चंदन राका आणि सिद्धार्थ बेदमुथा आदी मान्यवर उपस्थित होते.



