श्याम मानवाचे आव्हान धीरेंद्र शास्त्रींनी स्विकारले
ज्यांना खाज असेल, त्यांनी दरबारात यावे; धीरेंद्र शास्त्री

नागपूर | प्रतिनिधी
श्याम मानव यांच्यावतीने देण्यात आलेले आव्हान बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी स्विकारले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी थेट ज्यांना खाज असेल त्यांनी आमच्या दरबारात यावे असे प्रति आव्हान ही केल्याने खळबळ उडाली आहे.
श्याम मानव यांनी नुकतेच धीरेंद्र शास्त्रींना 10 लोकांची नावे, त्यांच्या वडिलांचे नाव, वय आणि मोबाईल नंबर अचूक सांगण्याचे आव्हान दिले आहे. तसेच, ‘अतींद्रिय शक्ती’च्या परीक्षेसाठी बंद खोलीत ठेवलेल्या 10 वस्तू ओळखायच्या आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये किमान 90 टक्के अचूकता आवश्यक ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया नागपूरमध्ये पत्रकारांच्या उपस्थितीत होईल. समितीकडून सांगण्यात आले की, धीरेंद्र शास्त्री यांना यश मिळाल्यास 80 लाख रुपये दिले जातील, अन्यथा याला लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेणे मानले जाईल.
श्याम मानव म्हणाले की, जर बाबांनी 10 लोकांची नावे, वय आणि मोबाईल नंबर बरोबर सांगितले, तर आम्ही हार मानू. वादामुळे नागपूरमधील वातावरण तापले आहे. एका बाजूला भाविक बाबांच्या समर्थनासाठी गर्दी करत आहेत, तर काही संघटना त्यांच्या जुन्या विधानांवरून निदर्शने करत आहेत.




