सावधान ! उन्हाचा वाढता तडाखा गर्भवतींसाठी धोकादायक
उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज

लोणार : गोपाल तोष्णीवाल
शहरात तापमानाचा पारा 43 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. उकाडा, अंगाची लाही लाही आणि अस्वस्थता यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गर्भवती महिलांसाठी हा उन्हाळा त्रासदायक होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे निर्जलीकरण, चक्कर येणे आणि रक्तदाबातील चढ-उतार यांसारख्या समस्या गर्भवती महिलांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो. मुळातच या काळात गर्भवर्तीमध्ये अनेक शारीरिक बदल झालेले असतात. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील तापमान वाढणे, सूज येणे आणि काही वेळा अकाली प्रसूतीचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो.
उन्हाळयात अशी घ्यावी काळजी
दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी घ्या
शक्यतो बाहेर जाणेच टाळा अन्यथा दुपारी तरी १२ ते ४ बाहेर पडू नका
सैल व सुती कपडे वापरा
आहारात फळे व द्रवपदार्थ वाढवा
चक्कर येणे किंवा उलटी येणे याकडे दुर्लक्ष करू नका
बाळाची हालचाल कमी जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तेलकट व मसालेदार पदार्थ टाळावे
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, योग्य काळजी घेतल्यास धोका टाळता येऊ शकतो. जास्तीत जास्त नारळ पाणी,लिंबू पाणी घ्यावे, कपडे शक्यतो पांढरा आणि फिक्या रंगाचे कपडे वापरावे, टरबूज काकडी जास्त प्रमाणात खावे, मसाले तेलकट पदार्थ टाळावेत”
– डॉ. सोनाली मुंदडा,
स्त्रीरोगतज्ञ लोणार
उष्णतेमुळे निर्माण होणारे धोके
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास गर्भाशय आकुंचन पावू शकते आणि अकाली प्रसूतीचा धोका वाढतो. उष्णतेमुळे रक्तदाबात चढ-उतार होऊन भोवळ येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. काही वेळा उष्माघात होऊन तातडीने उपचारांची गरज भासते. आईच्या शरीरातील पाण्याची कमतरता आणि वाढलेले तापमान यामुळे गर्भाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते.




