लोकभावना : ‘लोणारचे लोणावळा करू नका’ जनतेची थेट आमदाराला साद
अधिकमासात धारतीर्थ स्नानासाठी उघडा; "प्रशासनाने भाविकांच्या संयमाचा अंत पाहू नये

लोणार
येत्या काही दिवसांत (१७ मे पासून) सुरू होणाऱ्या पवित्र ‘अधिकमास’ (पुरुषोत्तम मास) निमित्त लोणार येथील ऐतिहासिक धारतीर्थ स्नानासाठी खुले करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून होत आहे. “लोणार हे केवळ फिरण्याचे पर्यटन स्थळ (लोणावळा) नसून ते कोटी भाविकांचे श्रद्धास्थान आहे, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी,” असा सूर आता उमटू लागला असून या प्रश्नी स्थानिक आमदारांनी तातडीने मार्ग काढावा, अशी साद जनतेने घातली आहे.
अधिकमासात पवित्र स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व असते. सरोवरातील गोमुख मंदिरातून पडणाऱ्या धारेखाली स्नान करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. मात्र, गेल्या काही काळापासून सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने धारतीर्थावर बंदी घातली आहे. “सुरक्षेचे नियोजन करणे हे प्रशासनाचे काम आहे, मात्र त्यासाठी परंपरा बंद करणे चुकीचे आहे,” असे मत नागरिकांन कडून व्यक्त केले जात आहे. जनतेने ही मागणी कोणतेही औपचारिक निवेदन न देता आता जनतेने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून मेहकरचे आमदार खरात यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदारांनी जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाशी चर्चा करून, बॅरिकेड्स किंवा संरक्षक यंत्रणा लावून अधिकमासापुरते तरी धारतीर्थावर स्नान करण्याची परवानगी मिळवून द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.
प्रशासनाचा आडमुठेपणा नडला
सरोवराची वाढलेली पाणी पातळी आणि निसरड्या पायऱ्यांचे कारण देऊन भाविकांना रोखले जात आहे. मात्र, जर लोणारचा विकास ‘पर्यटन’ म्हणून करायचा असेल, तर येथील ‘तीर्थक्षेत्र’ ही ओळख जपलीच पाहिजे. जर येणाऱ्या अधिकमासात स्नान उघडले नाही, तर भाविकांमध्ये मोठा असंतोष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
“परंपरा मोडली जात असेल तर विकासाचा काय उपयोग?”
प्रशासनाने सरोवराचे संवर्धन जरूर करावे, पण भाविकांच्या श्रद्धेचा बळी देऊन नव्हे. अधिकमासाचे स्नान हे आमच्या संस्कृतीचा भाग आहे, ते हिरावून घेऊ नका. –
श्रीनिवास मुंदडा
स्थानिक नागरिक




