जिल्हयात हवामान विभागाचा पाच दिवसीय येलो अलर्ट
बुलडाण्यात मान्सूनपूर्व पावासची अजून ही प्रतीक्षा

प्रतिनिधी | बुलडाणा
हवामान विभागाने जिल्हयासह राज्यभरात पुढील पाच दिवस पावासाचा येलो अलर्ट जाहिर केला आहे. अनेक जिल्हयात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावून वातावरणाला गारवा दिला असताना बुलडाणा जिल्हा मुख्यालयावर मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
नुकतेच हिंगोली, सोलापूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांसह विविध जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत असल्याची माहिती समोर येत आहेत. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील दे.राजा तालुक्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला असला, तरी बुलडाणा शहरासह परिसरात ढगाळ वातावरण, वाढता उकाडा आणि असह्य गर्मीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून “ये रे ये रे पावसा” अशीच अवस्था झाली आहे.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने चढलेला आहे. दिवसभर कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्णतेसोबतच वाढलेल्या आर्द्रतेमुळे वातावरण अधिकच असह्य बनले आहे. रात्री उशिरापर्यंत उकाडा कायम राहत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि कामगार वर्गाला या बदलत्या हवामानाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांत पावसाने अधूनमधून हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र जिल्हा मुख्यालय आणि अनेक ग्रामीण भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी वर्ग आता पावसाकडे डोळे लावून बसला असून खरीप हंगामाच्या तयारीसाठी पावसाची नितांत गरज असल्याचे सांगितले जात आहे.
हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला बुलडाणा जिल्हयात पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतही वातावरण अनुकूल होत असल्याचे संकेत आहेत.
बुलडाणा ४४ डिग्री तापमान
विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या जिल्हयांत बुधवारी उष्णतेची लाट सांगण्यात आली होती. त्याचा प्रत्यय नागरिकांना आला. शहर व जिल्हयाभरात उन्हाचा पारा सातत्याने वाढत चालला आहे. हवामान विभागाच्या संकेतानंतर बुधवारी शहराचा पारा ४४ डिग्री वर होता. त्याच बरोबर शहरात हवामान विभागाच्यावतीने ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पाच दिवस येलो अलर्ट
हवमान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील जिल्हयासह राज्यभरात पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पावसाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या संस्थेच्यावतीने जिल्हयात पुढील पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट सांगण्यात आलेला आहे. दरम्यान २८ मे पासून ते २ जून पर्यत कधी हल्का तर कधी मेघ गर्जनेसह मध्यम पावासची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्हयात मान्सूनपूर्व पावसाचा अनुभव घेतला आहे, मात्र जिल्हयाला ही संधी अद्याप मिळाली नसलयाने जिल्हयातील नागरिकांचे लक्ष ढगाकडे लागल्याचे चित्र आहे.




