स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा अन्यथा जोडोमारो आंदोलन : नागवंशी संघपाल पनाड
सुलतानपूर ग्रामस्थांचे ऊर्जामंत्र्यांसह महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन

लोणार
सुलतानपूर (ता. लोणार) येथे महावितरणकडून नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तातडीने थांबवावी, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी राज्याचे ऊर्जामंत्री तसेच महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामसभेचा ठराव असतानाही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांवर दबाव आणून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या संमतीशिवाय सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची कारवाई थांबवली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी महावितरण बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार लोणार आणि पोलीस निरीक्षक मेहकर यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, अख्तर भाई, दामुअण्ण सुरूशे, पुरुषोत्तम गाडेकर, डॉ. देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई, संतोष शिंदे, संतोष पाटील, अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी, असिम पठाण, दामोधर कुकडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. निवेदनावर शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचेही सांगण्यात आले.




