राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पाऊस, गारपीट

नागपूर | प्रतिनिधी
सध्या राज्यात पश्चिम विक्षोभाची (वादळ) स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यात उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मेघगर्जनेसह ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जाहीर केलेल्या 5 दिवसांच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गसह सातारा व सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, नाशिक व नाशिक घाट विभाग, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर आदी भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या सर्व भागाला मंगळवारी यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील काही भागांत पुढील 2 दिवसांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरण होईल. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळेल.




