मेळघाट बफर झोनमध्ये ‘राम सेतू’ पुलास हिरवा कंदील ; प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश

बुलडाणा | प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील वारी हनुमान ते सलवान दरम्यान पादचारी पुलाच्या बांधकामाला अखेर मार्ग मोकळा झाला असून वन विभागाने या पुलासाठी परवानगी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सदर परिसर मेळघाट व्याघ्र प्रकल्प च्या बफर झोनमध्ये येत असल्याने पुलाच्या बांधकामासाठी वन विभागाची मंजुरी आवश्यक होती. वारी हनुमान ते सलवान या मार्गावर पुलाची मागणी स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांनी वन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. अखेर वन्यजीव विभागाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये “राम सेतू” केबल-स्टेड एफओबी (Foot Over Bridge) पादचारी पुलाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. सुमारे ७४६.४० लाख रुपये खर्चाचा हा भव्य पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची उंची पायापासून सुमारे ४५.८० मीटर इतकी राहणार असून केबल-स्टेड तंत्रज्ञानाद्वारे हा पूल उभारला जाणार आहे. या पुलाच्या निर्मितीनंतर वारी ते सलवान दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. विशेषतः पर्यटक व स्थानिक पादचारी यांना मोठा दिलासा मिळणार असून या भागातील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




