राज्यातील 25 जिल्ह्यांतून जाणार राज्यमाता गोमाता संवाद यात्रा

बुलढाणा
देशी गोवंश संवर्धन, गोशाळांचे सक्षमीकरण आणि संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा ३१ मेपासून सुरू होणार असून तब्बल २५ जिल्ह्यांमधून सुमारे सहा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी सभा, संवाद कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत.
या यात्रेचा शुभारंभ ३१ मे रोजी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , मंत्री तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात्रेचा पुढील प्रवास १ जूनपासून सुरू होणार असून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर अशा जिल्ह्यांतून यात्रा जाणार आहे. १४ जून रोजी नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.
ही संवाद यात्रा १५ दिवस चालणार असून राज्यातील सुमारे एक हजार गोशाळांचा यात सहभाग अपेक्षित आहे. तसेच गोशाळा चालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकरी अशा जवळपास १५ हजारांहून अधिक लोकांशी थेट संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमातून गोआधारित शेतीचा प्रसार, गोमूत्र व शेणापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांना प्रोत्साहन, गोशाळांना आत्मनिर्भर बनविणे तसेच पशुसंवर्धन विभाग, गोशाळा संचालक आणि गोरक्षक यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय गोवंश संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करण्याचाही यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.




