मान्सूनची पुन्हा हुलकावणी; शेतकऱ्यांची चिंता वाढली

वृत्तसंस्था
देशात यंदा मान्सूनच्या आगमनाबाबत पुन्हा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, पावसाने अनेक भागांत हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सुरुवातीला मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता; मात्र वातावरणातील बदल, एल निनोचा प्रभाव आणि समुद्रातील हवामान प्रणालींमुळे मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे २६ मे रोजी केरळात दाखल होणारा मान्सून आता पुन्हा ७ दिवस उशीराने येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि उष्णतेची तीव्रता कायम असली तरी अपेक्षित पाऊस पडत नसल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होऊ लागला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहेत. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहू शकते.
तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरात तयार होत असलेल्या एल निनो परिस्थितीमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढली आहे. याचा थेट परिणाम शेती, पाणीटंचाई आणि अन्नधान्य उत्पादनावर होऊ शकतो. हवामान विभागाने काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान, हवामानातील या बदलांमुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. अनेकांनी बियाणे आणि खतांची तयारी करून ठेवली असली तरी पावसाअभावी पेरणी पुढे ढकलावी लागत आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाईने पेरणी न करता स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली असली तरी मान्सूनची गती मंदावल्याने यंदाच्या हंगामाबाबत अनिश्चितता कायम आहे. परिणामी, ग्रामीण भागात चिंता आणि प्रतीक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे



