अवकाळी वादळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

शिवसेना किसान सेनेचे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी | संग्रामपूर
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यात २७ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, मका, हरभरा, संत्रा, कांदा तसेच इतर पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेने केली आहे.
या मागणीचे निवेदन शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तहसीलदारांना सादर केले. निवेदनात नमूद आहे की, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. महसूल विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील अंदाजे २४ गावे अवकाळी पावसाने बाधित झाली असून सुमारे १५८६.७ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये धामणगाव, वसाळी, हडीयामहल, तामगाव, सावळा, मारोड, सायखेड, अकोली बु., अकोली खु., राजपूर, मालठाणा बु., मालठाणा खु., गोपाळखेड, झाशी, निमखेड, पळशी, करमोडा, शिवणी, लोहगाव बु., लोहगाव खु., शेवगा बु., शेवगा खु., लाडणापूर भाग-१ व चिचारी या गावांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर अमोल ठाकरे, कैलास कडाळे, मोहन ठाकरे, ज्ञानेश्वर गोतमारे, संजय खोंड, सुनील मुकुंद, जितेंद्र तायडे, नंदू खानझोड, सैय्यद रेहान सैय्यद भिकन, रविंद्र घोडसे, गजानन गोतमारे, विनायक गोतमारे, गणेश डाखोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
—-



