हाहाकार ; उत्तरप्रदेशात मुसळधार पाउसाने १०१ जणांचा बळी
मुंबई |
उत्तरप्रदेशात अवकाळी मुसळधार पाऊस, धुळीचे वादळ आणि विजांच्या कडकडाटाने भीषण हाहाकार माजविला असून राज्यभरात आतापर्यंत १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक फटका प्रयागराज जिल्ह्याला बसला असून तेथे २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, कच्ची घरे कोसळली तसेच वीज कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला. भदोही जिल्ह्यात १८, मिर्झापूरमध्ये १७ तर फतेहपूरमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. उन्नाव आणि बदायूंमध्ये प्रत्येकी ६, प्रतापगड आणि बरेलीमध्ये प्रत्येकी ४, तर सीतापूरमध्ये ३ जणांचा बळी गेला. चंदौली, कानपूर देहात, संभल आणि रायबरेली येथे प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला असून हरदोई, सोनभद्र, कौशांबी आणि रामपूरमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कौशांबी जिल्ह्यात वादळामुळे ठिणगी पडून भीषण आग लागल्याने १२ घरे जळून खाक झाली. अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.




