खळबळजणक ; धडा वेगळे शीर केल्यावर ही तरुणी पोलिस ठाण्यात हजर
पोलिस चक्रावले, जळगाव जामोद ‘मर्डर मिस्ट्री’ने घेतला थरारक ट्विस्ट

जळगाव जामोद
जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या जळगाव जामोद येथील अर्धवट जळालेल्या आणि शीर धडावेगळ्या अवस्थेतील तरुणीच्या मृतदेह प्रकरणाने आता अक्षरशः क्राईम थ्रिलरलाही मागे टाकणारे वळण घेतले आहे. ज्या तरुणीचा खून झाल्याचा दावा करत पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती, तीच तरुणी २७ मे रोजी आपल्या प्रियकरासोबत जिवंत अवस्थेत पोलिस ठाण्यात हजर झाल्याने संपूर्ण तपास यंत्रणाच हादरून गेली आहे.
२४ एप्रिल दरम्यान राजूर शिवारात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहामुळे सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतदेहाचे शीर कुऱ्हाडीने धडावेगळे करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांना कोणताही धागादोरा मिळत नव्हता. मात्र, मध्यप्रदेशातील खडकनार येथील शिवानी बापुराम कळमेकर ही तरुणी बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर तपासाने वेग घेतला. पोलिसांनी संशयाच्या आधारे शिवानीचे वडील बापुराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कथित गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानेच तिची हत्या केल्याची धक्कादायक कहाणी समोर आली. बांबूने डोक्यावर प्रहार करून हत्या, मृतदेह घरात लपवून ठेवणे, नंतर मोटारसायकलवर टाकून सीमाभागातील जंगलात नेणे, शीर धडावेगळे करणे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न… या सर्व घटनाक्रमामुळे हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि नियोजित असल्याचे चित्र उभे राहिले होते.
मात्र, या प्रकरणाने अचानक असा ट्विस्ट घेतला की संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ज्या शिवानीच्या खुनाचा गुन्हयात वडील व भावाल अटक करण्यात आली होती त्यामुळे सदर प्रकरण संपले असे वाटत असतांनाच तीच शिवानी आपल्या प्रियकरासोबत पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांसमोर उभी असलेली तरुणी पाहून तपास यंत्रणेलाही धक्का बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा? आरोपींनी नेमकी कुणाच्या हत्येची कबुली दिली? आणि पोलिस तपासात एवढा मोठा गोंधळ कसा झाला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून, आता पोलिसांसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे अर्धवट जळालेल्या मृतदेहाची खरी ओळख पटविणे, तर दुसरीकडे कबुलीजबाब आणि तपासातील विसंगतींचे गूढ उलगडणे. संशय, प्रेमसंबंध, कुटुंबीयांचा रोष आणि तपासातील नाट्यमय वळणांनी ही घटना आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.




