आमदार गायकवाड अन् विजय शिंदेंना तडीपार करा
वंचितची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्रतिनिधी । बुलडाणा
जिल्हयात दोन राजकिय दिग्ग्जात सुरुअसलेल्या वादामुळे जिल्हा बदनाम होतो आहे आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी वंचितच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. मात्र, हा वाद आता राजकीय धोरणांवरून न राहता वैयक्तिक आणि अतिशय गंभीर आरोपांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “बुलढाणा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते, मात्र या नेत्यांच्या ‘वैचारिक प्रदूषणामुळे’ जिल्ह्याची बदनामी होत आहे,” त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
“सामान्य गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करणारे प्रशासन, जिल्ह्याची शांतता भंग करणाऱ्या या बड्या नेत्यांवर मेहेरबानी का करत आहे?” असा सवाल यावेळी विचारण्यात आला. जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या दोन्ही नेत्यांना तातडीने जिल्ह्यातून बाहेर काढावे (तडीपार करावे), असे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
दोघांनी केलेले आरोप गुन्हेगार स्वरुपाचे
आमदार संजय गायकवाड आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हे केवळ राजकीय नसून ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. विजयराज शिंदे यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. इतकेच नव्हे तर एका अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपातही केल्याचा खळबळजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला असून, आपल्याकडे शासकीय अहवालासह सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संजय गायकवाड यांनी केलेले आरोप विजयराज शिंदे यांनी फेटाळून लावलेत. “आमदारांनी माझाच नाही तर आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांचा अवमान केला आहे,” असे म्हटले आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी माफी न मागितल्यास १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.




