एसटीचे स्मार्ट कार्ड बनले लुबाडणुकीचे कुरण, वरिष्ठांचा ही सहभाग?
१९९ रुपयांच्या कार्डसाठी मोजावे लागतात 260 रुपये

लोणार, | प्रतिनिधी
एसटीतून विविध वर्गातील प्रवाशांना पूर्ण मोफत तसेच ५० टक्क्यांची सवलत देण्यात येते. एसटी महामंडळाने (एनसीएमसी) कार्ड अनिवार्य केले आहे. या कार्डासाठी जिल्हाभर एजन्सी व उप एजन्सी काम करत आहेत. या कार्डसाठी एसटीने १९९ रुपये आकारण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश धाब्यावर बसवत अनेक एजन्सीधारक या स्मार्ट कार्डसाठी 260 ते 300 रुपये आकारत आहेत. हे कार्ड एन्सीधारकांसाठी लुबाडणुकीचे कुरण बनले आहे, या संदर्भात वरिष्ठांना माहिती दिली तरीही या बाबत अद्याप ही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांचा ही सहभाग आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
एसटीच्या वतीने विविध वर्गवारीतील प्रवाशांना प्रवासात विशेष सूट देण्यात आली आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, माजी सैनिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच व्याधिग्रस्त व इतर सवलतीधारक प्रवाशांना हे स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड काढण्यासाठी १९९ रुपये आकारण्यात येत आहेत. दरम्यान, या कार्डची एजन्सी शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर देण्यात आली आहे. हे एजन्सीधारक अमृत ज्येष्ठ, महिलांकडून एका कार्डसाठी 260 ते 300 रुपये आकारत आहेत. जास्त पैसे नाही दिले तर कार्ड देण्यास नकार देत आहेत.
मोबदला तरीही लूट
एजन्सीधारकांना प्रत्येक कार्डसाठी १० रुपये व कार्डवर रिचार्ज करण्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी ३ रुपये कमिशन देण्यात येते. असे असले तरी एजन्सी धारक हे कार्ड काढण्यासाठी चक्क जास्तीचे 60 ते 100 रुपये कार्डधारकांकडून उकळत आहेत.
तारखेची भीती
हा महिना शेवटचा आहे कार्ड काढले नाही तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, अशी भीती अनेक एजन्सीधारक दाखवत आहेत. त्यामुळे सवलतधारक या भीतीपोटी लवकरात लवकर नोंदणी करण्यासाठी घाई करत आहेत. दरम्यान, हे कार्ड कधीपासून अनिवार्य करणार आहे, याची माहिती एसटीकडून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली नसली तरी एजन्सीधारक मात्र ही भीती सवलतधारकांमध्ये पसरवत आहेत.
वरिष्ठांचा ही सहभाग?
या प्रकरणी सबंधित विभागाला दूरध्वनी वरून संपर्क करून ज्यादा पैसे घेत असल्याविषयी माहिती देण्यता आली. तरीही या प्रकरणात कोणतलीही कार्यवाही अद्याप ही करण्यात आली नाही. त्यामुळे या सर्वांना वरिष्ठांचा अभय आहे की काय ? अशी चर्चा जनसामान्यात रंगली आहे.




