काटीत चोरट्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; प्रतिकार करणाऱ्या ग्रामस्थाचा खून
मलकापूर येथे एकाच रात्री तीन घरांना केले लक्ष

संजय पानट
मलकापूर : नांदुरा तालुक्यातील, मात्र मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काटी गावात सशस्त्र चोरट्यांनी मध्यरात्री तीन घरे लक्ष्य केली. संशयास्पद हालचाली ओळखून चोरट्यांना रोखण्यासाठी धावलेल्या रायसिंग सीताराम सोळंके (रा. काटी) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सोळंके यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी (८ ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर चार ते पाच चोरटे गावात शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी बाळू हरिचंद्र भोगे यांच्या घरातून सोन्याचे कानातील दागिने, तर संजय रामभाऊ हिवाळे यांच्या घरातून साड्या चोरल्याची माहिती आहे. त्यानंतर चोरट्यांनी गणेश मानसिंग राठोड यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
गुरांच्या गोठ्यात विश्रांती घेत असलेल्या सोळंके यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. आरडाओरड होताच चोरटे पसार झाले. ग्रामस्थांनी सोळंके यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.
–घटनास्थळी वरिष्ठांचा तळ–
घटनेची माहिती मिळताच अपर जिल्हा पोलिस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहन माछरे, मलकापूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सतीश महल्ले, मलकापूर शहरचे पोलिस निरीक्षक गणेश गिरी आणि सोनाळ्याचे पोलिस निरीक्षक संदीप काळे घटनास्थळी पोहोचले. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले. चोरट्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, वाहनाचा वापर आणि परिसरातील संशयितांची माहिती तपासली जात आहे.
चोरट्यांची संख्या पाच किंवा त्याहून अधिक असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास हा प्रकार दरोड्याच्या कायदेशीर व्याख्येत येऊ शकतो. त्यामुळे नेमकी संख्या आणि प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
–गंभीर घटनांची धोकादायक मालिका–
काटीतील खून ही स्वतंत्र घटना मानता येणार नाही. जुलैमध्ये दुधलगाव शिवारात एका आदिवासी महिलेवर तिच्या पतीसमोर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्याआधी मलकापूर शहरातून गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांचे २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते; स्थानिक गुन्हे शाखेने त्यांची राजस्थानातून सुटका करून दोघांना अटक केली होती.
डिसेंबर २०२५ मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार आणि चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी शिक्षकासह दोघांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनांमुळे मलकापूर शहर आणि ग्रामीण हद्दीत रात्रीची गस्त, गावपातळीवरील माहिती यंत्रणा, सराईत गुन्हेगारांची तपासणी आणि महामार्गावरील नाकाबंदी अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.



