महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त मानवी हक्क परिषदचे आयोजन
महाड येथे १९ व २० मार्च रोजी दोन दिवसीय परिषद

प्रतिनिधी | बुलडाणा
महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने महाड येथे दोन दिवसीय मानवी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १९ व २० मार्च रोजी घेण्यात येणार आहे.
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. १९ मार्च रोजी दुपारी २ वाजता कॉ. आर.बी. मोरे नगरी, बेटकर महाराज मठ, लाडवली येथे मानवी हक्क परिषद पार पडणार आहे. त्यानंतर २० मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून चवदार तळे व क्रांतीभूमी येथे मिरवणूक काढून सत्याग्रहींच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन करण्यात येणार आहे. या परिषदेस माकपचे सरचिटणीस एम. ए. बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे व मरियम ढवळे, तसेच तुषार गांधी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम, आंबेडकरी साहित्यिक प्रज्ञा दया पवार, विद्रोही शाहीर संभाजी भगत तसेच आमदार विनोद निकोले हेही उपस्थित राहणार आहेत. सामाजिक समतेच्या लढ्याला नवे बळ देण्याचा निर्धार या परिषदेत व्यक्त केला जाणार आहे.
समाज परिवर्तनाच्या चळवळीला चालना देण्यासाठी या परिषदेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव, डॉ. अजित नवले, जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट् निमंत्रक कॉ. शैलेन्द्र कांबळे यांनी केले आहे.




