नारीची पूजा जिथे होते, तिथे देवतांचा वास – साध्वी सृष्टीलताजी
संगीतमय रामकथेचा बुलडाण्यात भक्तिभावात प्रारंभ

प्रतिनिधी | बुलडाणा
भारतीय परंपरेत नारीला शक्ती, माया आणि सृजनाचे प्रतीक मानले गेले आहे. कुटुंब, समाज आणि संस्कृतीची जडणघडण नारीच्या योगदानातूनच घडते. त्यामुळे नारीचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, समाजाच्या प्रगतीसाठी महिलांना समान स्थान देणे अत्यावश्यक आहे. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो, तेथे देवतांचा वास असतो, “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता” असे विचार साध्वी सृष्टीलताजी यांनी बुलडाण्यातील संगीतमय रामकथेच्या प्रथम पुष्पात व्यक्त केले.
हा कार्यक्रम ७ एप्रिल पासून अयोध्याधाम, लहाने लेआउट मैदानावर भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी २ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या या रामकथेच्या ‘प्रथम पुष्पा’त साध्वी साध्वी सृष्टीलताजी यांनी भारतीय नारीच्या महानतेवर प्रभावी विचार मांडले.या कार्यक्रमाचे आयोजन सद्भावना सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून आयोजित विविध कथांचा आढावा घेतला आणि नागरिकांनी रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष राजेश देशलहरा यांच्या हस्ते समितीच्या बोधचिन्हाचे (लोगो) विमोचन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य यजमान रतनलाल निरंजन वर्मा, ओम आनंद ज्वेलर्स परिवार, शांताबाई वर्मा, दीपक वर्मा, किरण वर्मा, पंकज अग्रवाल, सपना अग्रवाल, सरलादेवी अग्रवाल, रितेश अग्रवाल, डॉ. सुकेश झंवर, कोमलताई झंवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साध्वीजींनी महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याचे सांगत पंढरपूरच्या विठ्ठलाचे महात्म्य वर्णन केले. “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी” हा अभंग गाताच कथा मंडपात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी साध्वीजींचे व रामायण ग्रंथाचे पूजन करून आरतीत सहभाग घेतला. यावेळी माहेश्वरी समाज महिला मंडळासह विविध महिला मंडळांनी सामूहिक आरती केली. कथेवर आधारित प्रश्नमंजुषा अंजली परांजपे यांनी घेतली, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळाचे विशेष योगदान असून, तुलादानासाठी भाविकांनी पुढे यावे, असे आवाहन राजेश देशलहरा यांनी केले.




