उष्णतेचा डबल तडाखा; हवामान विभागाचा गंभीर इशारा

मुंबई | प्रतिनिधी
राज्यासह देशभरात उष्णतेची लाट तीव्र होत असून, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा एमआयडी ने दिला आहे. दिवसा कडक उन्हाचा तडाखा आणि रात्रीही उकाडा कायम राहिणार असल्याने देशभरातील नागरिकांना ‘दुहेरी उष्णतेचा फटका’ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर व मध्य भारतासह महाराष्ट्रातील अनेक भागात रात्रीचे वातावरणात ही तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. कोरडे आणि गरम वारे, ढगांची कमतरता आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. शहरांमध्ये ‘अर्बन हीट आयलंड’ प्रभावामुळे रात्रीचे तापमानही कमी होत नसल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. तज्ज्ञांच्या मते, दिवसभरातील उष्णतेनंतर रात्री शरीराला पुरेसा आराम न मिळाल्यास उष्माघात, निर्जलीकरण आणि थकवा यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणारे कामगार यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, काही भागात उष्णतेची लाट (Heatwave) अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलके, सूती कपडे वापरावेत, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
एकूणच, पुढील काही दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




