माकप व किसानसभेच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी काढला मोर्चा

भिवंडी
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर आज सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढत विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा ६ मे रोजी दुपारी आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी या दोन तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनाला CITU, जनवादी महिला संघटना, DYFI, SFI तसेच आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांचेही सक्रिय समर्थन लाभले.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी शेकडो जमीनविषयक दावे प्रशासनाकडे सादर केले. याशिवाय पाणी, सिंचन, वीज, रोजगार, शिक्षण, रेशन आणि रस्ते अशा विविध मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी १५ मे रोजी बैठक घेण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य किरण गहला व प्राची हातिवलेकर, राज्य कमिटी सदस्य भरत वळंबा, जिल्हा सचिवमंडळ सदस्य पी. के. लाली व कृष्णा भावर, तसेच भास्कर म्हसे, निकिता काकरा, गणेश दुमाडा, विद्याधर हरवटे, सुनील चव्हाण आदींनी केले.




