‘रोहयो’चा श्वास गुदमरला!
रोजगार सेवक संपावर असल्याने जिल्हयातील मजुरांच्या नशिबी उपासमारी

लोणार | गोपाल तोष्णीवाल
सरकारची ‘मागेल त्याला काम’ ही घोषणा सध्या तरी कागदावरच उरल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील हजारो ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या न्याय हक्कासाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मनरेगाचा बोजवारा उडाला आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब मजुरांच्या वाटयाला उपासमारी आली आहे. या मजूरांची लोणारसह संपूर्ण राज्यात चुली विझण्याची वेळ आल्याचे विदारक चित्र आहे.
सदर आंदोलनामुळे लोणारच नाही, तर विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील हजारो गावांमध्ये आज कामाचे ‘मस्टर’ कोरे पडले आहे. रोजगार सेवक संपावर असल्याने मजुरांची ऑनलाइन हजेरी (NMMS) घेणार कोण? हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. महाराष्ट्रातील लाखो मजुरांचे गेल्या काही दिवसांपासूनचे पेमेंट तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहे.
मजुरांचा टाहो: “आम्ही कोणाकडे बघायचे?””
उन्हाळ्यात शेतीची कामे नाहीत, हाताला पैसा नाही. आम्ही कामावर जायला तयार आहोत, पण साहेब म्हणतात आमचा संप आहे. मग आमच्या मुलांच्या पोटाचं काय?” असा आर्त सवाल लोणार तालुक्यातील एका मजुराने विचारला आहे. हीच भावना आज राज्यातील प्रत्येक मजुराची आहे.
या आहेत रोजगार सेवकांच्या मागण्या
राज्यातील रोजगार सेवकांची मागणी स्पष्ट आहे:हक्काचे मानधन: ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची (८,००० मानधन + २,००० प्रवास भत्ता) तात्काळ अंमलबजावणी करा. ऑनलाइन सक्ती नको: खराब इंटरनेटमुळे हजेरी लागत नाही, त्याचा दंड आम्हाला का? पूर्णवेळ दर्जा: आम्हाला कंत्राटी न ठेवता शासन सेवेत सामावून घ्या. या मागण्या पूर्ण चे आदेश निघेपर्यंत माघार नाही!” असा पवित्रा रोजगार सेवकांनी घेतला आहे तर
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
संपामुळे राज्यातील विकासाची कामे, पांदण रस्ते आणि विहिरींचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. मजुरांचा आक्रोश आणि रोजगार सेवकांची मागणी या कात्रीत ग्रामीण अर्थव्यवस्था अडकली आहे. आता सरकार यावर कधी तोडगा काढते आणि मजुरांच्या हाताला पुन्हा कधी काम मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




