राज्यस्तरीय गझल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ थाटात पडला पार
आंबेडकरी साहित्य अकादमी बुलडाणाच्यावतीने करण्यात आले होते आयोजन

प्रतिनिधी | बुलडाणा
साहित्य, समाजकारण आणि मानवतावादी विचारांची परंपरा जपणारे स्मृतीशेष रमेश सरकाटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आंबेडकरी साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गझल व भीमगीत स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. हा कार्यक्रम शहरातील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी हॉल येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला राज्यभरातील नवोदित साहित्यिक आणि कलाकारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
गझल स्पर्धेत सिंधुदुर्ग येथील प्रथमेश गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जालना येथील अमेय तांदूळजे यांनी द्वितीय तर यवतमाळचे गिरीश खोब्रागडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पुरस्कार भाग्यलक्ष्मी क्षीरसागर आणि शिवशंकर गोंड यांना प्रदान करण्यात आले. भीमगीत स्पर्धेत रमा पवार यांनी प्रथम, संतोषी झालटे यांनी द्वितीय तर शैला हिवाळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सुजाता लहाने आणि सुनीता अवसरमोल यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध गझलकार डॉ. गणेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद देशमुख होते. दरम्यान यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. देशमुख यांनी रमेश सरकाटे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याचे सांगितले. कविता, गझल, सामाजिक लेखन अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य आंबेडकरी साहित्य अकादमीने केले असून ही बाब प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर बोलताना डॉ. गणेश गायकवाड यांनी रमेश सरकाटे यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा गौरव केला. नवोदितांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे साहित्य क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांनी केले. सुरेश साबळे व लक्ष्मण घुमरे यांनीही रमेश सरकाटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास प्रा. डॉ. संतोष आंबेकर, शिवाजी जवरे, माधुरी सरकाटे, करुणा सरकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन शशिकांत इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन करुणा सरकाटे यांनी मानले. पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित गझल संध्येला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष मगर होते. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, वंदना वैराळकर, रमेश आराख, विशाल मोहिते, गोपाल मापारी आणि डॉ. गणेश गायकवाड यांनी सामाजिक आशयाच्या गझला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विलास सपकाळ, राजेश बावणे, अविनाश मुळे, डॉ. मंजुश्री खोब्रागडे आणि संतोष ढाले यांनी विशेष परिश्रम घेतले.
राज्यभरातील नवोदित गझलकारांचा गौरव
स्मृतीशेष रमेश सरकाटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राज्यस्तरीय गझल स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सिंधुदुर्ग येथील प्रथमेश गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपली गझल लेखनातील प्रतिभा सिद्ध केली. जालना येथील अमेय तांदूळजे यांनी द्वितीय, तर यवतमाळचे गिरीश खोब्रागडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय भाग्यलक्ष्मी क्षीरसागर आणि शिवशंकर गोंड यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवोदित गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम साहित्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.
भीमगीत स्पर्धेतून सामाजिक विचारांचा जागर
आंबेडकरी साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित भीमगीत स्पर्धेलाही रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सामाजिक जाणिवा आणि परिवर्तनवादी विचार मांडणाऱ्या सादरीकरणांमुळे स्पर्धेचे वातावरण भारावून गेले. या स्पर्धेत रमा पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर संतोषी झालटे यांनी द्वितीय आणि शैला हिवाळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सुजाता लहाने व सुनीता अवसरमोल यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. स्पर्धेमुळे नवोदित कलाकारांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




